Showing posts with label माझा गीता प्रवास. Show all posts
Showing posts with label माझा गीता प्रवास. Show all posts

Saturday, 30 November 2019

चंचल मनाला काबूत कसे आणावे?


आपल्याकडे एक म्हण आहे – वळले तर सूत नाही तर भूत! इतर कोणाला ती लागू होवो न होवो पण मनाला मात्र ती तंतोतंत लागू होते. अत्यंत चंचल अशी मनाची स्थिती असते. आत्ता एक गोष्ट करायला घेतो की पुढच्याच क्षणी यापेक्षा हे करु, नको नको ते करु अशी अवस्था होत असते आपली अनेकदा. बहिणाबाई आपल्या एका कवितेत मनाचे खूप छान वर्णन करतात. ते इतके चंचल आहे की आत्ता जमिनीवर असते तर क्षणात आकाशात जाते. पिकात शिरलेल्या ढोरासारखे कितीही हाकलले तरी पुन्हा पुन्हा विषयांकडेच वळते. त्यात इतके विकार उद्भवतात की कुठेही ते चटकन स्थिर होत नाही.

समर्थ रामदास स्वामी यांनी मनाला काबूत आणण्यासाठीच्या प्रयत्नांना सहाय्य व्हावे म्हणून २०५ श्लोकांची योजना केली. भगवद् गीतेच्या सहाव्या अध्यायातही अर्जुनाने या चंचल अशा मनाला काबूत ठेवणे हे वाऱ्याला अडविण्यासारखे दुष्कर आहे असे म्हटल्यावर भगवंतांनी मनाची चंचलता मान्य केली; मात्र त्यावर अभ्यासाने आणि वैराग्याने अंकुश ठेवता येतो असे सांगितले आहे.

आपली उन्नती करुन घेण्यासाठी उत्तम गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. त्या आत्मसात करण्यासाठी अभ्यास आवश्यकच असतो. इथे मनाचा अभ्यास आवश्यक आहे. आपले मन कशात रमते, कशाला घाबरते हे जाणून त्याला कशात रमवायचे व कोणत्या गोष्टीसाठी त्याला धाकात घ्यायचे याचाही अभ्यास करणे इथे अपेक्षित आहे. इंद्रियांवर निग्रह ठेवला नाही तर आरोग्य धोक्यात येईल हा धाकही उचितच असतो. भौतिक गोष्टीतली विफलता कळली की विषयासक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे तशा स्वरुपाच्या घटनांची उजळणी नैराश्य येणार नाही याची काळजी घेऊन करता येते.

सुख आणि दुःख या गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली कोणतीच कायम राहणारी नाही. आपण जन्माला आलो आहोत तेव्हा मृत्यू हाही अटळ आहे याची जाणीवही माणसाला योग्य तेवढेच इंद्रियोपभोग घेण्यापर्यंत सिमित करु शकते. वैराग्य निर्माण करु शकते. नित्य टिकणारे सुख म्हणण्यापेक्षा आनंद हा परमात्म्याच्या चिंतनाने मिळतो ही अनुभूती आली की त्याची गोडी मनाला लागते. त्यामुळे मनाच्या चंचलत्वाला काबूत आणण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींचे सहकार्य होते.

अभ्यास ही विधायक गोष्ट आहे. वैराग्य ही विध्वंसक क्रिया आहे. असे विनोबाजी त्यांच्या प्रवचनात आवर्जून सांगत. त्यासाठी ते शेतात बी पेरण्याचे आणि तण उपटून टाकण्याचे उदाहरण देत. मनात सद्विचारांचे पुन्हापुन्हा चिंतन करायचे हा झाला अभ्यास. आणि मनातील नको ते विचार काढूनच नाही तर फेकूनच द्यायचे हे झाले वैराग्य.


By

Padma Dabke

Pune, India

Friday, 1 November 2019

आत्मौपम्य


श्रीमद् भगवद् गीतेत काही काही शब्द असे येतात की चटकन त्याचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही. पण एकदा त्या शब्दा मागचा भाव, संकल्पना उकलली की गमंतही वाटते आणि आपला दृष्टिकोन अधिक प्रगल्भ होण्यास मदत होते. असाच मला भावलेला शब्द आत्मौपम्य.  ‘आत्मौपम्यया शब्दाचा अर्थ आहे आपल्या प्रमाणे. मानवनिर्मित वस्तूत हे शक्य आहे. जसे एकासारखी अनेक भांडी असू शकतात. अनेक वस्त्रे एकसारखी असू शकतात. दागिने असू शकतात. पण परमेश्वराच्या निर्मितीत प्रत्येक जीव हा स्वतंत्र एकक आहे. एकासारखा दुसरा नाही. तरीही भगवंत सहाव्या श्लोकात म्हणतात,  ‘आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन। सुखं वा यदि वा दुःखं योगी परमो मतः।याचा अर्थहे अर्जुना! जो कोणाचेही सुख अथवा दुःख आपल्याप्रमाणेच पाहतो तो योगी सर्वश्रेष्ठ होय.”

शब्दशः याचा अर्थ घेतला तर ते कधीच शक्य नाही असेच दिसेल. किंबहुना ते विपरितच वाटेल. प्रत्येकाच्या सुखदुःखाला वेगवेगळे घटक कारणीभूत असतात. एकाद्याला सुखाची वाटणारी गोष्ट अनेकदा दुसऱ्यासाठी दुःखाची असते असेही आपल्या निदर्शनास येते. अगदी आपली वाटणारी माणसेही सुखदुःखासंबंधात वेगवेगळे अनुभव घेतात. आणि इथे तर भगवंत कोणाचेही सुख अथवा दुःख आपल्याप्रमाणे पाहणारा सर्वश्रेष्ठ योगी म्हणतात हे कसे साधेल असा प्रश्न पडतो

पुरुषसूक्तामध्येसहस्त्र शीर्षा, सहस्त्र पादाःहजारो डोकी, हजारो हात, पाय इतर अवयव यांचे वर्णन आहे आणि असा सर्व मिळून पूर्ण पुरुष झालेला आहे. आपण एक उदाहरण घेऊन हा विचार समजून घेऊ. ज्या घरात आपण रहात असतो ते घर आपण मी बांधले असे म्हणतो. परंतु त्या ठिकाणी जेव्हा घर बांधले जाते त्यावेळी किती तरी हात, पाय, डोकी शिणलेली, श्रमलेली असतात तेव्हा ते तयार होते. एवढ्या घराला लागलेल्या विटाही जमवणे माझ्या एकट्याच्या शक्तीने शक्य नसते. इथे घर बांधतांना मी पैसे देऊन त्यांच्यातील पैशांची अपूर्णता भरुन काढली  त्या रुपाने मी त्यांच्यात सामावलो तर त्यांनी कष्टाने माझ्यातील अपूर्णता भरुन काढली म्हणून ते माझ्यात सामावले. विवेकाने हे समजून घेतले पाहिजे की मी या सर्वांमधील एक भाग आहे आणि हे सर्व माझ्यातलेच एक आहेत. आपली अंतरदृष्टी बदलली की मग यातील कोणाविषयीही मला मत्सर द्वेष वाटत नाही किंवा याहून मी वेगळा आहे असा भासही होत नाही. सर्वांप्रती समभाव निर्माण होणे म्हणजेचआत्मौपम्यहोय. एकाद्याच्या मुलाला उत्तम यश मिळाले तरी माझ्याच मुलाने ते यश मिळविले आहे असे वाटणे. किंवा एकाद्याची वेदनाही आपल्याला झालेल्या वेदनेइतकीच कळणे याला आत्मौपम्य म्हणता येईल

मी पणा म्हणजे संकुचितपणा. तो आपल्याला इतरांपासून निराळा समजण्याला कारणीभूत असतो. तो टाकून देऊन सर्वजण आपल्यासारखेच आहेत अशी समज येणे म्हणजे आत्मौपम्य होय.

By

Padma Dabke

Pune, India



Monday, 30 September 2019

धर्मस्थापना म्हणजे कायॽ


आपल्या आकलनापलीकडे एक शक्ती या जगात आहे असा अनुभव आपल्या प्रत्येकाला येतो. त्या शक्तीला नाव वेगवेगळी दिलेली दिसतात. कोणी देव म्हणेल, कोणी निसर्ग म्हणेल, कोणी परम तत्त्व म्हणेल तर कोणी ब्रह्म मानेल. या शक्तीचा प्रत्यय आपल्याला केव्हा व कसा येतो या संदर्भातले गीतेच्या अनुषंगाने थोडेसे चिंतन. 

प्रत्येक युगात असा काही काळ येतो की धर्मानुसार नित्यनेमाने अधिक प्रमाणात वागणारी माणसे हळूहळू शिथिल वर्तन करु लागतात. नकळत धर्माला ग्लानी येते. अधर्म वाढू लागतो. काही जणांचा अहंकार वर्धिष्णु होतो. अशास्त्रीय पद्धतीने ते जीवन व्यतीत करतात. विषय लोलुप इंद्रियांचा स्वैराचार सुरु होतो. विवेकबुद्धी नष्ट होत जाते. आपले तपही ते अशाच अमर्याद अधिकारप्राप्तीसाठी खर्ची घालतात आणि मग सामान्य जनांवर अत्याचार करायला सुरुवात करतात. त्यांची मुजोरी इतकी वाढत जाते की ते सज्जनांनाही पीडा देऊ लागतात. धर्माबद्दल द्वेष, अनुद्गार आणि मी म्हणेन तीच पूर्व अशा पद्धतीचे वर्तन करु लागतात. देव वगैरे खोटे. मीच काय तो कर्ता धर्ता अशी प्रवृत्ती वाढते. दुष्टपणाची पराकोटी होते. आपल्या धर्मात अशा मनुष्यांनाच राक्षस अशी संज्ञा दिलेली आहे. हिरण्यकश्यपु, रावण, महिषासूर ही काही नावे त्याच पठडीतील. आज दिसणारे आतंकवादीही त्याच वंशाचे. याच परिस्थितीचे वर्णन यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। या श्लोकार्धात येते.

अशावेळी दुष्टांचे निर्दालन व्हावे असे अनेकांना वाटते पण त्यांचे काही चालत नाही. तेव्हा अशी माणसे एकत्र येऊन काही अनुष्ठान करतात. प्रार्थना करतात. त्या परमतत्त्वाला विनवणी करतात. दिसत असलेल्या परिस्थितीचे निवेदन करतात. आधी ज्याप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलास तसा आताही ये म्हणून हाक मारतात. माणसामाणसांतील आत्मविश्वास जागवतात. अन्यायाला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य मिळावे असा प्रयत्न करतात. त्यासाठी  परमतत्वाला आवाहन करतात की तुझेही सहकार्य प्राप्त होवो. तेव्हा भगवंत त्यांच्या सहाय्यार्थ अवतार घेतात. याचाच अर्थ असा की विश्वचालक शक्ती जी आहे ती देहात अवतरित होते. म्हणजेच अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। सगुण रुपात येऊन लीला करतात.

अवतरित झालेला भगवंत मग दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी सत् शक्तीला संघटित करतात. धर्माची पुनःस्थापना करतात. त्या त्या युगानुरुप विस्कटलेली समाजघडी सुचारु पद्धतीने चालावी अशी व्यवस्था लावून देतात. विनाशकारी शक्तींना हद्दपार करण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतील त्या करतात. कधी शस्त्राच्या सहाय्याने कधी युक्तीच्या सहाय्याने. रावणाचा, कंसाचा नाश शस्त्रसामर्थ्याने केला गेला तर हिरण्यकश्यपुला युक्तीच्या सहाय्याने संपविले गेले. नरसिंहासारखा अवतार दुष्ट निर्दालनानंतर लगेच अंतर्धान पावला. धर्मस्थापनेचे कार्य प्रल्हादाकरवी केले गेले. मात्र राम आणि कृष्ण या अवतारांना अनेक दुष्टांचे निर्दालन करावे लागलेले दिसते. रामांच्या काळात काही विशिष्ट भागापुरताच अधर्म माजलेला दिसतो. तर कृष्णावतारात या अधर्माची व्याप्ती वाढलेली दिसते. 

विस्कटलेल्या समाजघडीचे नव्या पद्धतीने बांधणीचे कार्य म्हणजेच धर्मसंस्थापना होय. आणि ती घडी विस्कटण्याचे कार्य करणारांचे पारिपत्य म्हणजे दुष्टांचे निर्दालन. भगवद्गीतेतील चवथ्या अध्यायात 

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ 

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

या श्लोकातून हेच व्यक्त होते. 

By

Padma Dabke,

Pune, India


Saturday, 7 September 2019

गुरुपौर्णिमा


गुरुपौर्णिमा झाली की गीतासंथा वर्गातील विद्यार्थिनींना आपले कलागुण दाखवायला एक उत्तम संधी असते ती म्हणजे गोकुळअष्टमी. गीतेचा उद्गाता स्वतः परमात्मा श्रीकृष्ण याचा उत्सव. आमच्या वर्गात बाईंनी एक प्रथा सुरु ठेवली आहे की या कार्यक्रमासाठी सर्व काही विद्यार्थिनींनीच करायचे, लिहायचे, बसवायचे. या आधी तुम्हाला एक पोवाडा ऐकवला होता ते आठवत असेलच

आज कल्याण स्वामी म्हणजे रामदास स्वामींचे एकनिष्ठ शिष्य यांनी मनुष्याचे आयुष्य १०० वर्षे आहे असे कल्पून त्याचे दहा भाग केले आहेत. आणि प्रत्येक दहा वर्षात माणसाची कशी स्थिती असते ते वर्णन केले आहे आणि त्यापासून सावध होऊन माणसाने रामनाम घ्यायला हवे असे सांगतात. ते खरे तर खूप वेळा ऐकले होते. पण गीता शिकायला लागल्यानंतर असे वाटायला लागले की गीतेतील तत्त्व जर आपण अमलात आणू शकलो तर ही वेळ येणारच नाही. संकल्पना सुचली पण नेमके शब्द काही एकटीला योग्य योजता आले नाही. मग आमच्याच वर्गातल्या आधीच्या विद्यार्थिनींनी सहाय्य केले आणि खालील रचना तयार झाली. ती आज सादरप्रत्येक कडव्याची पहिली ओळ कल्याणस्वामींची आणि दुसरी आमची

सावध सावधान सावध सावधान। वाचे घ्या हो रामनाम॥ध्रु.
सावध सावधान। सावध सावधान। वाचे घ्या हो हरिनाम॥ ध्रु.
दहा वर्षे बालपण। वीसा वर्षी तारुण्य। अंगी चढे अभिमान। तेव्हा घडे साधन॥१॥
गीता संथा घेई झणी। पाठांतर बालपणी। योग्य साधन मिळता। अंगी येई विनम्रता॥१॥
तिसाची होय भरती। कांता पुत्र लाभ होती। मग त्यांचीच भ्रांती। कळे स्वरुपाची स्थिती॥२॥
कर्मयोगाची येता जाण। भ्रांतीचे सहजी उच्चाटन। कर्मगती विलक्षण। सोडा फलाचे बंधन॥२॥
चाळीस वर्षे झाली। डोळा चाळिशी आली। नेत्रांसी भूल पडली। जवळी असता दिसती॥३॥
ज्ञानचक्षु प्राप्त होता। ईश्वराशी सन्निधता। मग कैसी पडे भूलॽ सत्कर्माची घेऊ झूल॥३॥
पन्नास वर्षे झाली। दंतपंक्ती हालती। श्याम केश शुभ्र होती। त्याला म्हातारा म्हणती॥४॥
पन्नाशीची नको चिंता। कळली ज्ञानाची महत्ता। क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ज्ञान। आणि ज्ञेयाचे चिंतन॥४॥
साठीची बुद्धी नाठी। हाती घेऊनिया काठी। वसवसा लागे पाठी। त्याला पोरे हासती॥५॥
साठी बुद्धी नसे नाठी। कळली ध्यानाची महती। पळविले काम क्रोध। घेई भगवंताचा शोध॥५॥
सत्तरीची विवंचना। बसल्याने उठवेना। उठल्याने चालवेना। दिसे दिस दैन्यवाणा॥६॥
सत्तरीची नको भिती। मनी उपजली भक्त्ती। नामस्मरणी दृढ मन। देहाचे सहजी विस्मरण॥६॥
वय झाले ऐंशी। फिरतसे दिशा दिशी। पाण्याविना मत्स्य जैसा। तैसी होते कासाविसी॥७॥
होईना का वय ऐंशी। भेटी आपुली आपणाशी। संवाद भगवंताशी। संपादिती पुण्यराशी॥७॥
नवावर दिले शून्य। सुख राहिले गुंज। म्हणतसे माझे माझे। आता सांग काय तुझेॽ॥८॥
भगवद्गीता हाती येता। अभ्यासे ती जाणून घेता। संपते माझे मीपण। सारे भगवंताशी अर्पण॥८॥
राजहंस उडोनि गेला। देह कोरडा पडला। जन म्हणति मेला मेला। मोठा आनंदाने नेला॥९॥
योगयुक्त्त जीवन असता। नाही मरणाची चिंता। देही असता मुक्त्त झाला। लोकी ख्यातीसी पावला॥९॥

सर्व साधारणपणे सगळ्यांचाच राजहंस उडून जातो पण काहींचा राहिला. तुकाराम, मीराबाई . चा. आपला पण राहू शकतो त्यासाठी कल्याणस्वामी रहस्य सांगतात – 

सांगतसे गुरुदास। सोडा संसाराची आस। सांगतसे सज्जनास। धरा सद्गुरुची कास॥ सावध सावधान। वाचे वदा रामनाम॥१०॥
सांगती भगवंत सोडा संसाराची आस। सांगतसे सज्जनास। धरा सद्गुरुची कास॥ सावध सावधान। वाचे घ्या हो हरिनाम॥१०॥

By

Padma Dabke

Pune, India