Showing posts with label मराठी कथा. Show all posts
Showing posts with label मराठी कथा. Show all posts

Friday, 1 November 2019

दोन कप चहा

दारात आलेल्या कोणालाही उपाशीपोटी, रिकाम्याहाती पाठवू नये ही शिकवण लहानपणापासून च मिळालेली...
आमचं घर जरा शहराबाहेर असल्याने वस्ती कमी होती...
पाऊस पडून गेला की नव्या हिरवाईने जमिन सजायची...
एक आजोबा आपल्या बकऱ्या चरायला घेऊन यायचे नेहमी तिकडे... कधी कधी आमच्या घराच्या बाहेर ओट्यावर बसायचे...
गरीब असले तरी चेहऱ्यावर नेहमी हास्य, नीट राहणी, ठिगळ असले तरी स्वच्छ कपडे...
मी रोज त्यांना पाणी आणि गुळ द्यायची...
आजोबा तेव्हढ्यानेच खुश होऊन तोंडभरून आशीर्वाद देऊन निघून जायचे आपल्या बकऱ्यांना घेऊन...
आम्हाला ही त्यांची सवय झाली होती...
एखादवेळी ते आले नाही की चुकल्यासारखे वाटायचे...
आजोबा यायचे...
दोन एक तास बाहेर बकऱ्या चारत बसायचे आणि जातांना गुळ न पाणी घेऊन जायचे...
कित्येक दिवस झाले ते आजोबा आलेच नाही... आम्हालाही चुकल्यासारखे वाटत असे... मी रोज त्यांच्या वाटेचा गुळ आणि पाणी रोज बाजूला ठेवायची... पण ते आलेच नाही...
जवळजवळ महिनाभर ते नाहीच आले...
आम्हाला वाटलं की त्यांनी कदाचित बकऱ्या चारण्याची जागा बदलली असेल...
एक दिवस ते आजोबा आमच्या ओट्यावर बसलेले दिसले... डोळ्यांत पाणी आणि अंगावर मळके कपडे होते... चेहरा ही पडलेला दिसत होता... जणू खूप दिवसांपासून आजारी होते...
आम्ही दोघांनी ही अगदी मनापासून त्यांची विचारपूस केली... खूप रडले ते... अगदी लहान लेकरासारखे...
त्यांना नेहमीप्रमाणे गुळ आणि पाणी दिले... पाणी पिऊन शांत झाल्यावर, त्यांना जेवायला ही दिले... आधाशासारखे जेवले ते... जणू कित्येक दिवसांपासून ते जेवले नव्हते...
जेवण करून आजोबा बकऱ्या घेऊन गेले... आज बकऱ्या कमी दिसत होत्या... आम्ही विचार च करत होतो, नेमकं काय झालं असणार???
दुसऱ्या दिवशी आजोबा आले... बकऱ्या घेऊन
ओट्यावर बसले असतांना त्यांना विचारले, आजोबा काय झालं?? एवढे दिवस का नाही आलात??? काही अडचण आहे का??? पण ते काहीच बोलेना...
मग आम्ही विचारणं ही सोडलं...
आजोबा रोज यायचे बसायचे आणि गुळ-पाणी घेऊन जायचे... पण चेहऱ्यावरचं हास्य ही हरवलं होतं...
मात्र एक दिवस त्यांनी गुळ-पाणी घेण्यास नकार दिला...
म्हणाले, "बाई आज गुड-पाणी नको..."
"पण.......  च्या देशील काय??"
"अहो, आजोबा चहाला कोण नाही म्हणेल!!
बसा इथेच... लगेच आणते..."
"बाई, दोन कप देशील का व बाई ??"
आजोबा जरा कचरतच बोलले...
"लय दिस झाले बग... च्या नाय पिलो... देशील का व बाई???"  डोळ्यांत पाणी आलं होतं... आजोबा पुटपुटत होते...
छान गुळाचा चहा केला... दोन कप... काठोकाठ भरून आजोबांना दिले...
आजोबा चहाकडे असे बघत होते जणू, कधी चहा बघितला नाही...
आज लहान बाळासारखेच ते आशेने बघत होते आणि वागत ही होते...
आम्हालाही नवल वाटत होते...
चहा बघून ते बोलके झाले आणि सांगू लागले...
"3 पोरं आणि 6 लेकी पदरी...
सगळ्यांची लग्न झालीत... आपापल्या घरट्यांसाठी पारखी झालेत... त्यांनाही संसार लागला... पण कोण कोणासाठी नसतं बाय..."
महिन्याभरापूर्वी आजारी असलेल्या त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले...
" तेव्हा लेकी बाय आल्या... १५ दिवस राहून गेलेत पण या बापाला कोणी ईचारलं नाय बग..."
"लहान पोरगी म्हणली, बाबा... चला घरी पण जवाया ची नजर काही वेगळीच बोलत होती... मग पोरीला तसंच पाठवलं सासरी..."
"पण घरची बाय गेल्यावर घर लय सुनं-सूनं वाटतंय... ती गेल्यापासून धड जेवण नाय की च्या बी नाय..."
"च्या प्यायची लय तलब आलती, पर कसं बोलू काय समजेना बग बाय..."---आजोबा.

"अहो, आजोबा, चहाला काय असं लागतं... तुम्हाला जेव्हा जेव्हा ईच्छा होईल सांगत जा...
मी देईल चहा..."
अजून एक कप भरून गरम गरम चहा त्यांच्या हाती दिला...
आजोबांनी मोठया आनंदाने झुरका मारत बशीने चहा घेतला... त्यांच्या डोळ्यांत आनंद ओसंडून वाहत होता आणि तोंडात चहाभरून आशीर्वाद...
जातांना आजोबांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं...
आणि आमच्याही...

By

Dipti Ajmire,

Karlsruhe, Germany

नदी वाहते

शाळकरी असताना मे महिन्याच्या सुट्टीत ऐन उन्हाळ्यात उगारला गेले होते. उगार म्हंजे मिरज,सांगली जवळचे,बहुतांश मराठी वस्ती असूनही आता कर्नाटकात असलेले, आणि  वाहत्या 'कृष्णेचे' सान्निध्य लाभलेले संपन्न गाव. बारामाही नदी म्हंजे काय हे पहिल्यांदा तिथे पाहिले मी. माझ्या गावची नदी 'भारंगी' ही मुख्यतः पावसाळ्यात वाहणारी, डिसेंबरपासूनच हळूहळू तिचे पात्र आक्रसत जायचे आणि एप्रिल मे मधे फक्त केंदांडात जिथे तिचे पात्र खोल होते तिथे पाणी उरायचे. त्यामुळे 'कृष्णेच्या' पात्रात ऐन उन्हाळ्यात 'भारंगीत' पावसाळ्यातही नसेल एवढे पाणी पाहून हरखून जायला झाले होते.

नंतर 'कृष्णेचे' दर्शन झाले नरसोबाच्या वाडीला. तिचे पात्र  तसे लांब वाटले होते मला देवळापासून. ऐन पावसाळ्यात देऊळ पुर्ण पाण्याखाली जाते यावर विश्वासच नव्हता बसला माझा. अर्थात वाडीतच तिला 'पंचगंगा' येवून मिळते हे तरी कुठे माहित होते मला. कराड जवळच्या 'कोयने'बरोबरच्या 'कृष्णेच्या' संगमाबद्दल मात्र खुप ऐकले होते. एखाद्या गोष्टीबद्दल खुप ऐकावे, अपेक्षा वाढवाव्यात आणि प्रत्यक्ष दर्शनात अपेक्षांपेक्षा मोठं असे काही मिळावे असे झाले होते मला संगम पाहून.

यावर्षीच्या उन्हाळ्यात उगारला साक्षात 'कृष्णेचे' पात्र कोरडे पडल्याचे ऐकले आणि मराठवाडा विदर्भात असलेले दुष्काळाचे सावट सप्तनद्या असलेल्या संपन्न 'कृष्णाखोऱ्यात' पसरल्यासारखे वाटले. ऐन पावसाळ्याच्या सुरवातीला कोरडे पात्र पडलेल्या 'कावेरी' नदीचे पुन्हा पात्र भरताना स्वागत करण्याऱ्या लोकांचा व्हिडीओ बघितला. सुरवातीला फेकच वाटला. पण नंतर धडधडले छातीत. एवढी मोठी नदी आणि कोरडी पडली. कशामुळे? कमी पाऊस, तुटलेले जंगल, वाढते नागरीकरण का धरणे अणि त्याच्या पाणीसाठ्याचे अयोग्य व्यवस्थापन यामुळे?

जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिना आला तो जोरदार पाऊस घेवून. सांगली, कोल्हापूरकडे पावसाच्या दमदार बँटिंगनंतर सर्व नद्या भरून वाहू लागल्याच्या बातम्या येवू लागल्या. हळूहळू नद्या धोक्याची पातळी ओलांडू लागल्या आणि त्याचवेळी धरणे पण भरत आल्यामुळे कराव्या लागलेल्या विसर्गामुळे इतक्या फुगल्या की पात्र सोडून बऱ्याच बाहेर पसरल्या.

'कृष्णा'खोरे मुळातच अनेक नद्यांनी बनलेले. कृष्णेच्या उपनद्या सुध्दा स्वतंत्र नदी म्हणता येईल एवढ्या मोठ्या. 'कोयना', 'येरला' ,'वारणा', 'पंचगंगा' या महाराष्ट्रातील आणि 'घटप्रभा', 'मलप्रभा' या कर्नाटकातील साधारण सारख्या भौगोलिक प्रदेशातून वाहत येणाऱ्या नद्या. या सगळ्याच पट्यात एकाचवेळी चांगला पाऊस झाला. बरं या सगळ्याच नद्यांवर बांधलेली मोठी मोठी धरणे. शहरांची वीज आणि पाण्याची, आणि खेड्यांमधील उसाची तहान भागवणारी. ही तहान भागली पहिजे म्हणून येईल ते सगळे पाणी धरून ठेवणारी.  या तहानेची भुक इतकी मोठी की एकुणच व्यवस्थेला नदी वाहती  राहिली पाहिजे याचे काहीस सोयरसुतक नाही.

त्यामुळे पावसाळा सोडल्यास कोरड्याच भासणाऱ्या नदीपात्राजवळचं बांधकामे झाली. कोरडे पडलेले ओढे नाले बुजवले गेले. उन्हाळ्यात नदी कोरडी ठेवून धरणात पाणी राखले गेले. सुरवातीच्या पावसानंतर अधिकच्या हव्यासापायी जरूरीपेक्षा जास्त पाणी धरणात साठवले गेले. आणि मग एकदम पाऊस पडल्यावर नाकातोंडाशी गाठ आल्यावर सोडले गेले. एकाचवेळी पाऊस आणि सर्व धरणातील विसर्ग यामुळे नद्या फुगल्या आणि नेहमीचे वाटा शोधून वाटेत येणारे सगळे कवेत घेत पसरल्या. संगमाजवळ जिथे दोन फुगलेल्या नद्या मिळतात तिथली अवस्था तर अधिकच भीषण. सगळ्यांना चटका लावणारी ती बोट दुर्घटना घडली ती ब्रह्मनाळला अशाच 'कृष्णा येरला' संगमाच्या ठिकाणी.

बऱ्याच ठिकाणी 'गंगामाई' नुसती भेट देवून नाही गेली तर चांगली आठवडाभर राहिली. मागच्या वर्षी केरळात झाले तेच थोड्या फार फरकाने कृष्णेच्या खोऱ्यात झाले. ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पाठीवर फक्त हात ठेवून लढ म्हणणे पुरेसे नाही हे जाणून अनेक हात मदतीला सरसावले. शासनानेही काही चांगले उपक्रम राबवले. लोक हळूहळू सावरतील. उभे राहतील. पण हळूहळू हे सगळे कशामुळे घडले ते सोयीस्करपणे विस्मृतीच्या विळख्यात जाईल. पुन्हा नदी कोरडी पडली की किंवा अंगणात आली कीच आठवले जाईल.

By

Prajakta Karve

Mumbai, India

Saturday, 7 September 2019

प्रार्थना

काही  वर्षापूर्वी आमच्या ऑफिसतर्फे एक ट्रेनिंग प्रोग्रॅम झाला होता. मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा अशा ट्रेनिंगला लोक जमतात तेव्हा त्यातल्या निम्म्याहून अधिक लोकांना रिक्षा, बस,ट्रेनचा तासादोनतासाचा प्रवास करायला लागलेला असतो. पुन्हा समोर दिसत असतात आजच्या दिवसातली राहलेली कामे जी उद्या कितीही संकट आली तरी पूर्ण करावीच लागणार असतातच. त्यात पुन्हा बायका असतील तर त्यांचा निघण्याआधी तासादोनतासाचा वेळ ओट्याशी उभे राहण्यात गेलेला असतो. कुणाच्या डोक्यात इतर चिंता असतात तर कुणाच्या डोक्यात जाताजाता खरेदी करण्याचे विचार. काही नवं शिकवण्याआधी या सगळ्यांना एका प्लँटफॉर्मवर आणण्यासाठी ' बिरारी 'सरांनी त्यांच्या सत्राची सुरवात प्रार्थनेनी केली. ती प्रार्थना होती 'अंकुश' सिनेमातले 'सुषमा श्रेष्ठ' आणि 'पुष्पा पागधरे' यांनी गायलेले 'इतनी शक्ती हमे देना दाता...' हे गाणे. 

नंतर हळूहळू रोज सकाळी ऑफिसमधे काम सुरू करण्याआधी हे गाणे लावले जावू लागले. मी कायम आस्तिक नास्तिकतेच्या सीमारेषेवर भटकणारी. पण हे गाणे खरतर प्रार्थना सुरू असताना डोळे मिटून नकळत गुणगुणताना डोक्यातील विचारचक्रे सुरू असतात आणि रोज नवा अधिकअधिक खोल असा अर्थ लागत जातो. 

"इतनी शक्ति हमें देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना।"

सर्वशक्तिमान अशा दात्याकडे म्हंजे ईश्वराकडे वा अज्ञात शक्तीकडे आपले हे मागणे. आपण मागतो ते कुणाकडे तर आपल्या अत्यंत जवळच्या माणसाकडे. जिथे काही मागताना आपला अंहभाव मधे येत नाही किंवा आत्मसन्मानाला ठेच पोचत नाही. आणि मागणे तरी काय तर माझ्या क्षमतांवरचा, मी प्रामाणिकपणे अंगिकारलेल्या मार्गावरचा माझा विश्वास नेहमी कायम राहो.

"हम चले नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना॥"

इथे मला कायम तो 'दिवार' मधला शशी कपूरचा रस्ता आठवतो. कच्चा, खाचखळग्यांनी भरलेला लांबचा पण नेकपणाचा. नकळत घडणारी छोटीशी चूक किंवा पडणारा छोटासा मोह वेळ वाईट असेल तर एखाद्या व्यक्तीला कुठून कुठे घेवून जावू शकतो. टिकटिक काही नेहमी प्रेमाचीच वाजली पाहिजे असं नाही. वेळेवर धोक्याची घंटा ही वाजली पाहिजे त्यासाठी ईश्वराचे पाठबळ आणि मनावरच्या संस्काराची ताकद दोन्ही पाहिजे.

"दूर अज्ञान के हो अंधेरे,
तू हमें ज्ञान की रौशनी दे।
हर बुराई से बचते रहें हम,
जितनी भी दे भली ज़िन्दगी दे॥
बैर हो ना किसी का किसी से
भावना मन में बदले की हो ना।"

माझ्या मनातले अज्ञान मग ते माझ्या कामामधल्या एखाद्या गोष्टीबद्दल असेल किंवा कुणाबद्दल समज  गैरसमज असतील तर ते दूर होवोत. आळशीपणा, कामटाळूपणा, अप्रामाणकिपणा सारख्या अनेक वाईट वृत्तींपासून माझे रक्षण व्हावे. दुसऱ्याशी स्पर्धा किंवा बदला यांत माझी शक्ती खर्ची होऊ नये. त्याऐवजी माझ्या शक्तीचा उपयोग व्हावा अधिक अधिक चांगल्या कामासाठी.

"हम ना सोचे हमे क्या मिला है
 हम ये सोचे किया क्या है अर्पन
 फुल खुशिंयो के बॉंटे सभी को
 सबका जीवन ही बन जाये मधुबन
 अपनी करूणा का जल तू बहाके
 करदे पावन हर एक मन का कोना'

आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याच्या बदल्यात आपल्या खूप अपेक्षा असतात. पैसा, नाव, कौतुक अशा अनेक. त्याचा विचार करण्यात आपण बहूमुल्य वेळ वाया घालवतो. तोच वेळ जर का काम अधिक नेटके, लवकर,अचुक करण्यावर घालवला तर. किंवा रूढ पद्धतीत अधिक चांगले बदल कसे करता येतील यावर घालवला तर आपला वेळ तर सत्कारणी लागेलच. पण हे करताना जो आनंद मिळेल त्याने आपल्या सर्वांचेच आयुष्य आनंदमय होईल.

प्राजक्ता कर्वे जोशी

Wednesday, 31 July 2019

हे पापच असेल ना

हे पापच असेल ना

नर्मदा बाजारात निघाली होती. कुलूप लावता लावता समोर ‘राधिका’ दिसली.

   ‘‘बाजारात चाललेय’’ नमूने राधिकाच्या प्रश्नांकित चेह-याला उत्तर दिलं.

   ‘‘मला पण जायचं होतं. तीळ आणायचे होते, पण कंटाळा आलाय.’’

   ‘‘मग मी आणून देते. किती आणायचेत?’’

       खूष होऊन राधिकाने अर्धा किलो तीळ आणायला सांगितले.

   नर्मदा बाजारात गेली. तिची सगळी कामं करून आली. राधिकाला तीळ दिले.

   राधिका थोड्या वेळाने तीळगूळ घेऊन आली नमूला द्यायला. आली, गप्पा मारत बसली.

   नर्मदाने तिच्या मुलींसाठी गाण्याच्या क्लासची चौकशी केली.

   ‘‘आहे इथं एक. पण ते शास्त्रीय संगीत आऽऊऽ ते नाही शिकवत. ती गाणी, भजनं वगैरे शिकवते.’’

   ‘‘नाही. मला शास्त्रीय संगीतच शिकवायचंय त्यांना. मी इथे कुणाचं तरी नाव ऐकलेलंय. कोण बरं? अंऽ अगदी तोंडावर येत होतं बघ आत्ता. महिला विद्यापीठात संगीताच्या रीडर आहेत. आपल्याच कॉलनीत रहातात म्हणे ग. काय नाव सांगितलं होतं बरं? हां... रजनी, रजनीताई.’’

   ‘‘हं’’ राधिकाच्या चेह-यावरचे भाव झटकन बदलले. ती एकदम सावरून बसली. काहीतरी सांगण्यासाठी ती एकदम उत्सुक दिसायला लागली.

   ‘‘आहेत कुणी रजनीताई आपल्या कॉलनीत?’’

   ‘‘आहेत’’ राधिका तिरस्काराने म्हणाली. ‘‘तिकडे नको पाठवू पण मुलींना. फार कडक आहेत त्या. पुन्हा मोठ्या आर्टिस्ट आहेत त्या. छोटे - मोठे क्लास घेत नाहीत. परीक्षा घेतात आधी. त्यांना गाणं पसंत पडलं तरच शिकवतात. फार घमेंडखोर आहेत बाई त्या.”

   नमूचं काम झालं होतं. राधिका मुलींना रजनी ताईंकडे पाठवू नको हे जसजसं म्हणत राहिली तसतसं रजनीताईच आपल्या मुलींना शिकवू शकतील याबद्दल तिची खात्री पटत चालली.

   राधिकाने शेवटचं अस्त्र काढलं. ‘‘मी सांगणार नव्हते. पण सांगून टाकते... त्या बाईचं अफेअर आहे वयाहून तिच्यापेक्षा छोट्या अशा एका आर्टिस्टशी.’’

   ‘‘विवाहित आहेत?’’

   ‘‘कोण?’’

   ‘‘बाई?’’

   ‘‘नाही ना. म्हणून तर....’’

   ‘‘असू शकतं ना?’’ नमू एवढंच म्हणाली पण तिला पुढे बोलायचं होतं;  ‘‘आम्ही विवाहित आहोत. ती बिचारी काय करणार? मेनॉपॉज असेल, बेचैनी असेल. किती स्वाभाविक आहे. शरीरातल्या वादळांना कसं सांभाळत असेल? आपल्या देशात स्त्रीला पण एक शरीर असतं. पुरुषासारखीच त्या शरीरालाही भूक असते. ही गोष्ट लोकांना मानवतच नाही.’’ यातलं काहीही ती बोलली नाही.

   ‘‘म्हणूनच म्हणतेय ना, तिचं तर अफेअर आहे. तिला कुठनं वेळ मिळणार कुणाला शिकवायला!’’

   का? का? दिवसरात्र एकच काम करत असेल का ती? तिच्या वैयक्तिक आयुष्याचा शिकवण्याशी काय संबंध? नमू मनातल्या मनात...

   तिची चीडचीड झाली. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलून ‘राधिका’ गेली. नमूने निश्चय केलाच होता मुलींना रजनीताईंकडे शिकवण्याचा. हां, रजनीताई तिच्या मुलींना शिकवायला तयार होतील की नाही, हा प्रश्न वेगळा.

   रोज संध्याकाळी राधिका खाली कॉलनीच्या बागेत जाते. तिथं कॉलनीतल्या आणखी काही बायकाही येतात. सगळ्या गप्पा मारत बसतात. त्यात प्रामुख्याने विषय असतो, कुणाचं कुणांशी अफेअर, कुणाच्या घरात काय भांडणं वगैरे. कोण कसं दिसतं, कुणाचे कुठले अवयव कुठे सुटलेत? अमकी रोज दुपारची बाहेर जाते, तासाभरात येते, कुठे जात असेल... वगैरे वगैरे विषय चालू राहतात. एक प्रकारे सैतानाचा अड्डाच.

   नमू रजनीताईकडे जाऊन आली. त्या म्हणाल्या, ‘‘मी ऐकीन पहिल्यांदा त्यांचं. पाहीन काय, कितपत रस आहे त्यांना. केवळ फॅशन म्हणून गाणं शिकणा-यांशी मला काही घेणंदेणं नाही.’’

   नमूला हे आवडलंच, रजनीताईसुद्धा! त्यांच्या काळ्या डोळ्यात स्पष्टता आणि सरळपणा होता. जगण्याला जसं आहे तसं, सरळपणे स्वीकारण्याची हिंमत होती.

   नमू राधिकाच्या ग्रुपसमोरूनच रजनीताईंच्या घरातून बाहेर पडली. नमूला ठाऊक होतं, आता चर्चा सुरू होईल. ती, तिच्या मुली आणि रजनीताई. त्यांच्याकडे लक्ष न देता ती घराकडे वळली.

   जिन्याच्या पाय-या चढताना तिला बासरीचे सूर ऐकू आले. ते स्वर इतके व्याकुळ होते की काही कळायच्या आत ती धावत सुटली.

   बासरीचा आवाज राधिकाच्या घरातून येत होता. नमू तिच्या घराशेजारच्या जिन्याच्या पाय-यांवर बसली. डोळे मिटून घेतले. ऐकत राहिली.

   ते सूर ऐकताना तिचे डोळे भरून आले. पण मन इतकं आनंदाने उचंबळून आलं की छातीत धडधडायला लागलं. कधी जलद धावणा-या कधी सुस्तावून अंगभर पसरणा-या सुखाच्या लहरी...

   राधिकाकडे कोण एवढी थोर कलाकार व्यक्ती असावी जी माणसाला स्वतःचा विसर पाडू शकते? नमूला माहीत नव्हतं. राधिकाही कधी काही बोलली नव्हती. राधिकाची मुलगी रुना इतकी सुंदर बासरी वाजवते?

   किती वेळाने कुणास ठाऊक. बासरीने सूर संपले. नमू भानावर आली.

   तेवढ्यात राधिकाच्या घराचा दरवाजा उघडून राधिकाचा नवरा राजीव बाहेर आला. दरवाज्याजवळच्या पाय-यांवर नमूला अशी बसलेली पाहून तो दचकलाच.

   नमूही घाईने उठून उभी राहिली. काही क्षण दोघांनाही काहीही बोलायला सुचलं नाही. मग नमूच कशीबशी बोलली, ‘‘तुमच्या घरी... बासरी... कोण वाजवत होतं?’’

   ‘‘मी... मीच वाजवत होतो, असंच.’’

   ‘‘असंच? तुम्ही? तुम्ही वाजवता? शिकलायत तुम्ही?’’

   ‘‘थोडं फार, बरं वाटतं स्वतःचं स्वतःलाच. या ना आत. पण राधिका नाहीये.’’

   ‘‘माहीतीये, खाली पाहिलं मी तिला’’ थोडं थांबून खूप हिंमतीने ती एक वाक्य बोलली, ‘‘तुम्ही खूप छान वाजवता. माझ्या.... माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला’’ आणि झटकन स्वतःच्या घराकडे वळली.

   राधिकासारखी बायको असेल तर कुणीही शांततेसाठी तडफडेल. राधिका खाली फालतू गप्पा मारत बसते आणि हा माणूस... इथे अपूर्व स्वरांना बोलावून आणतो.

   किती नाजूक असतात हे क्षण! जे स्त्री-पुरुषांच्यामध्ये मूकपणे उभे राहतात. राधिकाच्या नव-याला तिने आजपर्यंत जेव्हा जेव्हा बघितलं होते तेव्हा तेव्हा त्याच्यात खास काहीच जाणवलं नव्हतं. आज त्याच्याबाबतीत तिला काहीतरी खास कळलं होतं. स्वतःच्या कलेचा आनंद लुटण्यासाठी हा माणूस रोज राधिकाची टकळी घराबाहेर जाण्याची वाट पाहतो. पतीपत्नी असूनही किती मोठं अंतर असू शकतं दोघांच्या दरम्यान आणि त्याच्या बासरीचे स्वर आपल्या कणाकणात साठवून घेण्याचा प्रयत्न करणारी नमू त्याची कुणीही नाही. त्याच्याशी एक स्तिमहास्याच्या देवघेवीइतकाही तिचा आजपर्यंत संबंध आलेला नाही.

   राजीव ऐवजी राधिका इतकी सुंदर बासरी वाजवत असती तर नर्मदानं तिचं किती कौतुक केलं असतं. घरी जाऊन ती तिचं बासरीवादन ऐकत बसली असती. तिला पुन्हा पुन्हा वाजवायचा आग्रह केला असता.

   राजीवला ती काहीही म्हणू शकत नाही. या समाजाची चौकटच अशी आहे की त्यात उत्सफूर्ततेला वाव नाही. ठरावीक नात्यांच्या पलीकडे माणसामाणसात नाजूक नात्याचे बंध नाहीत. माणसामाणसातले संबंध उत्स्फूर्ततेने, तरलतेने, उत्कटतेने रचले गेले तर ते पाप. जसं, राजीवच्या बासरीवादनाचे कौतुक करणं, विशेषतः राधिका नसताना! तेव्हाच तो वाजवणार ना! तेव्हा बासरी ऐकणं, स्वरांचा आनंद घेणं, राजीवचं उत्स्फूर्तपणे कौतुक करणं...

By

Sujata Mahajan

USA

   

     

Sunday, 17 March 2019

रामाचा दुसरा वनवास

‘‘हॅलो’’
‘‘कोण बोलतंय?’’
‘‘नंदा, मी लक्ष्मणमामा बोलतोय.’’
‘‘काय म्हणताय मामा? खूप दिवसांनी आमची आठवण झाली.’’
‘‘आता काय बोलायचं नंदा! ना तुमचा वाडा राहिला, ना रामाचं मंदिर, ना तुझे
सासरे राहिले, ना रामजन्माचे उत्सव. मग तुमच्या आमच्या भेटी कुठल्या व्हायला.’’
‘‘काय मजा असायची उत्सवाची. ती चक्रीकीर्तनं, पालखीचा सोहळा, मोठमोठ्या
पंक्ती....’’
‘‘तुम्हा बायकांचा पिट्टा पडायचा पण’’
‘‘हो मग, पाच वाजता पंगत बसायची आमची, की पुन्हा संध्याकाळच्या
कीर्तनाची, आरतीची गडबड.’’
‘‘गेले ते दिवस! आता इतक्या ठिकाणी कीर्तनं करतो पण तुमच्या काशीकर
राममंदिरासारखी मजा नाही कुठे. बरं ते जाऊ दे नंदा. मी तुला आज यासाठी फोन
केला होता आपले राम - लक्ष्मण, सीतामाई तुम्ही भटबुवांना दिलेत का?’’
‘‘छेऽ छेऽ काहीतरीच काय, रंगाभाऊजींकडे आहेत ते सध्या’’
‘‘नंदा,’’ लक्ष्मणमामाचा आवाज गंभीर झाला.
‘‘आपले राम भटबुवांच्या मंदिरात पाहिले मी.’’
‘‘अहो, काय सांगताय काय मामा? तिथे कसे जातील?’’
‘‘नंदा, तुझ्या सासूने मला भाऊ मानलं होतं. तुझे सासरे - आमचे मेव्हणे -
नावाजलेले कीर्तनकार : त्यांच्या घरी राहून कीर्तन शिकलो मी त्यांच्याकडून. माझ्या
लहानपणापासून या मूर्ती पाहतोय मी. सत्तरी आली आता माझी. साठेक वर्ष जी मूर्ती
मी रोज पाहतो, ती मला ओळखता येणार नाही? भटबुवांच्या देवळात कीर्तनं चालू
आहेत माझी. आज पहिला दिवस. त्यांच्या देवापुढे डोकं ठेवायला गेलो. त्यांच्या
विठोबा - रखुमाई शेजारी आपले राम उभे. अलीकडे लक्ष्मण पलीकडे सीतामाई. थक्क
उभा राहून निरखत राहिलो. बुवांना काही बोललो नाही. पण मन लागेना म्हणून तुला
फोन लावला.

नंदा थक्क झाली होती. ‘‘मामा, आता तुम्ही सांगताय तर खरंच असणार. पण
कशा काय गेल्या असतील मूर्ती तिथे. काही कळेना बाई.’’
‘‘वाडा पाडला तेव्हा मूर्ती कोणाकडे होत्या?’’
‘‘सुमित्रावहिनीकडे होत्या म्हणजे आमच्या थोरल्या जाऊबाईंकडे. त्या पूजाबिजा
करायच्या.’’
‘‘मग, रंगाकडे कधी गेल्या, कशा गेल्या?’’
‘‘अहो, वर्ष झालं असेल. रंगाभावजी आले एक दिवस आणि म्हणायला लागले,
रामाच्या जवळ होतो तोपर्यंत माझं बरं चाललं होतं. वाडा पाडला, मूर्ती गेल्या आणि
माझ्यामागे पीडा सुरू झाली. तुम्ही मूर्ती मला द्या. मी नीट सांभाळीन.’’
‘‘आणि तुम्ही दिल्या?’’
‘‘मग? असं म्हटल्यावर नाही कसं म्हणणार?’’
‘‘काही कळेना मला. राम तिथे कसे गेले? तू जरा चौकशी कर रंग्याकडे फोन
करून.’’
‘‘बरं बरं करते’’ नंदाने फोन खाली ठेवला.
रंगाकडे कसा फोन करावा? विचित्र माणूस. काय उत्तर देईल, कसा वागेल, नेम
नाही. राम आणि वाड्याच्या आठवणीत तिची रात्र गेली.
सासरे गेले. उत्सव, सण, सोहळे, यांचं मोठ्ठं पर्व संपलं. ती मोठमोठी पातेली,
भात ठेवलेल्या डेगी, स्वयंपाक करणाऱ्या मंगलाबाईंचं मिश्र भाज्यांचं लोणचं.
स्वयंपाकघरात कोप-यात हात धुण्यासाठी मोरी होती. दोन्ही बाजूंना कट्टे होते.
ब-यापैकी मोठी असल्याने पुरुष मंडळी तिथे अंघोळीही करत.
महाप्रचंड स्वयंपाकाच्या उष्णतेने काहिली झालेल्या मंगलाबाई मोरीच्या
कट्ट्यावर शेषशायी भगवान व्हायच्या. हाताची उशी करून ओट्यावर आरामात
झोपायच्या ‘‘गार वाटतं’’ म्हणत. एका बाजूला पडल्या तर मोरी; दुस-या बाजूला
पडल्या तर मोठमोठी आमटीची वगैरे पातेली. मंगलाबाई इकडे किंवा तिकडे कधीतरी
पडतील अशी प्रत्येक वर्षी प्रत्येक पिढीच्या लहान मुलांनी वाट पाहिली. पण हुशारीने
झोपणा-या मंगलाबाई कधीही पडल्या नाहीत. मोरी पडली, वाडा पडला, मंगलाबाई
पडल्या नाहीत.
काशीकर बुवांचे सर्वात मोठे चिरंजीव ‘पुंडलीकबुवा’ शिकले नाहीत. किरकोळ
आजारपणाचं निमित्त करून घरीच राहिले. दुसरं काही केलं नाही. देव देव करत
बसायचे. सकाळी सगळं आवरायला त्यांना दोन - तीन तास लागायचे. विशेषतः

शौचविधी. सगळ्या वाड्यातल्या पन्नास-साठ माणसांसाठी दोनच संडास होते. सकाळी
वाड्याच्या कुठल्याही खिडकीतनं पाहिलं की, जिन्यावर नंबर लावून बसलेली मंडळी
दिसायची. तो एक महत्त्वपूर्ण अड्डा होता. इथे नवीन विचारांची देवघेव व्हायची,
प्रेमप्रकरणे जमायची, तुटायची. ‘आत’ गेलेल्या मंडळींबद्दल चर्चा व्हायची, त्यांच्या
आतील कार्याची चिकित्सा व्हायची.
बंडूकाका नंबरच्या जिन्यावर बसून जोक सांगण्याबद्दल प्रसिद्ध होते.
कित्येकदा ज्याचा नंबर आला असेल, त्याला पकडून ते जोक ऐकवत असतील तर तो
आत गेला तरी ते बाहेर एकटेच बसून ऐकवायचे.
संपूर्ण वाड्यात कुणाला किती वेळ लागतो याबद्दलचं गणित सर्वांना पाठ होतं.
अमूक ना, गेला की एक मिनिटात पाण्याचा आवाज येईल पण तमूक गेला असेल ना,
तुम्ही आरामात एक झोप काढून या किंवा बाहेर जाऊन भाजी घेऊन या.’’ पुंडलीकबुवा
तमूकपैकी होते म्हणजे पाऊण तास वाल्यांपैकी.
दुपारी मंडपात कुणी नसलं किंवा मध्यरात्री कुणी पाणी प्यायला उठलं की
पुंडलीकबोवा रामाच्या गाभा-यात जाणा-या दारापाशी उभं राहून रामाशी बोलताना
दिसायचे. तासन्‌तास बोलत असायचे. मुलांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय. ती गाभा-
याच्या मागे लपून ऐकायची. कळायचं काहीच नाही. ‘‘तुम्ही आम्हाला कबूल केलं
होतंत पण शब्द पाळला नाहीत’’ वगैरे कस्मे -वादे चालू असायचे रामाशी.
राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती अत्यंत आकर्षक. त्यांना चढवले जाणारे सुंदर
कपडे आणि दागिने मुलं पाहत राहायची. शेजारी एक पाय दुमडलेला नमस्कार
मुद्रेतला हनुमान. आसपासच्या सगळ्या परिसरात या मूर्ती प्रसिद्ध होत्या. काशीकर
बोवांचा रामनवमी उत्सव प्रसिद्ध होता. कीर्तनं अशी रंगायची. दुरून दुरून कीर्तनकार
यायचे.
मंडपात सगळ्यांच्या पथा-या टाकलेल्या असायच्या. रात्री कफनी, फेटा वगैरे
घातलेली, भव्यदिव्य वाटणारी कीर्तनकार मंडळी सकाळी ‘नंबर’ ला दिसली की गंमत
वाटायची. सुंदरबुवा गाण्यासाठी प्रसिद्ध. त्यांनी ‘सा’ लावला की सगळी लहान मुलं
घड्याळात पाहत राहायची, कधी ‘सा’ संपेल याची वाट पाहात.
चक्रीकीर्तनात मध्यरात्री चहा, कॉफीचे कप फिरवायला लागले, की मोठी
माणसंसुद्धा लहान मुलांसारखी तोंड उघडं टाकून लाळ गाळत अस्ताव्यस्त झोपलेली
दिसयाची...

असा तो वाडा, असे ते उत्सव आणि अशा त्या मूर्ती. वाडा पडला, मंदिर गेलं,
भाऊ वेगवेगळे झाले, एकेक करत वारलेसुद्धा. फक्त रंगा उरला. मूर्ती तात्पुरत्या
सुमित्राबाईकडे आल्या होत्या पण ‘रंगा’ आपल्या नशिबाच्या संबंध रामाच्या मूर्तीशी
जोडून त्या घेऊन गेल्यापासून मूर्तीबद्दल काहीच कळलं नव्हतं.
रंगा विक्षिप्त होताच. मागे नवा फ्रीज आणला म्हणून नंदा, सुमित्रा पाहायला
गेल्या. ‘हा काय!’’ म्हणून दाखवला. नंदाने फ्रीजचं दार उघडलं ती थक्क झाली. फ्रीज
लावलेला नव्हता. त्याच्या एका कप्प्यात कपड्याच्या घड्या ठेवलेल्या होत्या. एका
कप्प्यात मुलांची पुस्तकं, साईडच्या कप्प्यात सुई, दोरा, बटनं, पावडर, कंगवे वगैरे.
नंदाला बोलायचं सुचेना. ती फक्त आतल्या दिशेने बोट दाखवून प्रश्नार्थक खुणा करत
राहिली. तेव्हा रंगा निर्विकारपणे म्हणाला, ‘‘आम्हाला कोणाला फ्रीज मधलं काही
आवडेना म्हणून त्याचं कपाट करून टाकलं.”
अशा रंगाने मूर्तीचं काय केलं असेल? जो फ्रीजची ही अवस्था करतो, तो
मूर्तीची पण अनाकलनीय स्थिती करू शकेल. विचारावं कसं न कुणाला?
असाच आठवडा गेला. एकदा संध्याकाळी ती कोप-यावर भाजी आणायला गेली.
तिथं चिखल्यांचं राममंदिर होतं. चिखले गृहस्थ तिला ओळखत होता. तीही त्याला
ओळखत होती. तिला पाहून तो मंदिरातनं बाहेर आला. आता हा पीळ मारणार हे
ओळखून ती त्याला पाह्यलंच नाही असं दाखवायला लागली. पण चिखले आलाच.
‘‘अहो वैनी, काशीकर वैनी’’ करत.
‘‘काय हो?’’ ती नाईलाजाने वळली.
‘‘अहो वैनी, ते भटबुवा तुमच्या रामाच्या मूर्ती विकताहेत.”
‘‘काऽऽय?’’ लक्ष्मणमामांच्या बातमीचा शहानिशा झाला.
‘‘होऽ वैनी.’’
‘‘तुम्हाला कसं कळलं?’’
‘‘अहो, माझ्याच मागे लागलेत ना तुम्ही मूर्ती घ्या म्हणून, मी म्हटलं अहो
माझंच रामाचं मंदिर आहे. तिथं मूर्ती आहेत. मी आणखी तुमच्या मूर्ती घेऊन काय
करू? तर म्हणतात कसे, तुमच्या मूर्तीपेक्षा काशीकरांच्या छान आहेत. तुम्ही तुमच्या
राम - लक्ष्मणांना भरत शत्रुघ्न करा आणि त्या मूर्ती राम - लक्ष्मण म्हणून ठेवा.’’
प्रसंगाचं गांभीर्य लक्षात येऊनही नंदाला हा प्रस्ताव ऐकून हसू यायला लागलं.

‘‘अहो, हसताय काय वहिनी, मी खरंच सांगतोय तुम्हीच विचार करा. राम,
लक्ष्मण, भरत शत्रुघ्न अशा चौघाचौघांचं कुठं देऊळ असतं काय? आणि शीतामाईचं
काय? आमची पण आहे, त्यांची पण आहे. दोन दोन शीतामाया’’
‘‘एकीला उर्मिला करायची’’ राम - लक्ष्मण, भरत - शत्रुघ्न, सीता - उर्मिला
आणि हनुमान एवढ्या सगळ्यांची गर्दी असलेला गाभारा कसा दिसेल. या कल्पनेने
नंदाला आता मात्र हसू आवरेना. चिखलेबुवा विचित्र चेहरा करून तिच्याकडे पाहात
राहिले.
हसण्यानं डोळ्यात आलेलं पाणी पुसत ती कसंबसं म्हणाली, ‘‘मी बघते हं काय
करायचं ते’’ दुस-या दिवशी तिने फोन करून नणंदेला बोलावून घेतलं, मोठेपणानं तीच
रंगाला जाब विचारू शकेल म्हणून.
नणंद आल्यावर तिला सगळी हकीगत सांगून म्हणाली, ‘‘सुधाताई, मला
कळतच नाहीये की मूर्ती भटबुवांकडे कशा पोहोचल्या?’’
सुधाताई म्हणाल्या, ‘‘अगं, हा रंग्या काय साधाय का? मध्ये एकदा दोघे
नवराबायको मूर्ती रिक्षात घालून भांडत भांडत माझ्याकडे आले.’’
‘‘म्हणजे कसे?” नंदाच्या डोळ्यासमोर दृश्य उभं राहिलं; रिक्षात एका बाजूला
रंगा एका बाजूला सुशीलावैनी बसलेल्या, दोघांच्या मध्ये तिन्ही मूर्ती उभ्या आणि हे
भांडतायत रामाच्या आडून.
‘‘रंगाचं म्हणणं, रामानं माझं वाटोळ केलं. त्याला घरी आणल्यावर माझ्यामागे
फारच पीडा सुरू झाल्या.’’
‘‘मग वैनीचं म्हणणं वेगळं होतं का?’’
‘‘नाही सुशीचं पण म्हणणं तेच होतं.’’
‘‘मग भांडत कशासाठी होते?’’
‘‘भांडणं वेगळ्या कारणासाठी झाली होती. पण भांडणं राम आणल्यामुळे होतात
हा निष्कर्ष होता. म्हणून रामाला रिक्षात घालून माझ्याकडे आणलं. उघडे बोडके, कपडे
नाही, दागिने नाही, मुकुट नाही, काऽही नाही. बसले आपले बिचारे माझ्या घराच्या
एका कोप-यात. दुस-या दिवशी मीच त्यांना कपडे आणले.’’
‘‘अगबाई! असं झालं होय! पण मग तुमच्याकडून मूर्ती गेल्या कशा?’’
‘‘अग, हाच परत एकदा आला. चुकलं माझं. घेऊन जातो मी त्यांना परत,
म्हणाला, इंदोरला एका मंदिराचं काम चाललं होतं. त्या लोकांना चांगल्या पूजेत
असणा-या मूर्ती हव्या होत्या. म्हणून मी त्या वेळेस विचारलं त्याला. पण ‘नाही’

म्हणाला. दोन - तीन ठिकाणाच्या लोकांनी विचारलं होतं मूर्तीबद्दल. पण हा ‘नाही’
च म्हणाला. आणि घेऊन गेला माझ्याकडून.
अजूनही उलगडा होत नव्हता. मूर्ती भटांकडे गेल्या कशा? शिवाय अजून
विठ्ठल रखुमाईच्या वेगळ्या मूर्ती होत्या. हनुमान होता, त्यांचं काय झालं? सुधाताई
म्हणाल्या, ‘‘अग, त्यात काय एवढं अवघड आहे! पुन्हा काहीतरी कटकट झाली असेल
आणि आता मी रागावेन म्हणून तो गुपचुप भटांकडे मूर्ती ठेवून आला असणार.
भटांना सांगितलं असेल विकून टाका.’’
काही दिवसांनी त्यांना बातमी कळली, की राम पुन्हा घरी गेले. त्यांचा वनवास
संपला. म्हणून एकदा हिय्या करून नंदा आणि सुधाताई रिक्षा करून रंगाकडे गेल्या.
वाडा पाडून बांधलेली फ्लॅट सिस्टिम. इतकी अजागळ बांधली होती की ती
पाहून नंदा आणि सुधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. इथे वाड्याचा भव्य दरवाजा होता
त्याला अडसर काढला की तो मंडपात सरकावला जायचा. लहान मुलं त्यावर
खेळायची. मंडप म्हणजे वर छत आणि चारी बाजूंना गज लावून बंद केलेला एक
प्रशस्त हॉल. त्यातच देऊळ. इथेच रामासमोर कीर्तनं व्हायची. दरवाजापासून मंडपाला
समांतर असा आत जाणारा बोळ. त्यात सायकली ठेवल्या जायच्या. तिथं बसायलाही
लांबलचक कट्टा होता. मंडप भरला की मंडळी तिथं कीर्तन ऐकायला बसायची.
मंडपाच्या मागे अंधा-या खोल्या, तळघर, तळघरात उत्सावासाठी लागणारी
मोठमोठी भांडी, लहान मुलांना धाक दाखवायचं ठिकाण. बोळ संपला की अंगण.
अंगणात एक बंद आड. सर्व बाजूंनी जिने. वर चौथ्या मजल्यापर्यंत खोल्या. अंगण ही
मोठमोठ्याने हाका मारायची व खालून वर, वरून खाली अशा सार्वजनिक गप्पा
मारायची जागा.
काहीही आर्किटेक्चर नसलेला पण चैतन्याने सळसळणारा वाडा. दंतकथांनी
आणि उत्सवांनी गजबजलेला आणि आता या वाड्याची एक ओंगळ, अंधारी इमारत
झाली होती.
त्या दोघी जिने चढून वर गेल्या. रंगाचं घर पाहिलं. चहा आला. चहा
घेतल्यावर सवयीने कपबशा आत ठेवायला नंदा स्वयंपाकघरात गेली. सिंकमध्ये
तेलाचा डबा, तिखटमिठाचं पाळं, चहासारखेचे डबे ओळीने लावलेले. नंदा दचकलीच. हा
काय प्रकार? तिने प्रश्नार्थक चेहरा करून, तिच्या मागोमाग आलेल्या सुशीलाबाईंकडे
पाहिलं. ओशाळल्या चेह-याने त्यांनी खुलासा केला, “अगं, बिल्डरने इथं नुसतं सिंक

केलंय. खाली पाईपलाईनच नाही. त्यामुळे आम्ही याचा कोनाड्यासारखा वापर करतो
आणि बाथरूममध्ये कपबशा बिसळतो.’’
नंदाला फ्रीजचा कपाटासारखा वापर आठवला, तेव्हा हे योग्यच असं म्हणून ती
कपबशा ओट्यावर ठेवून बाहेर निघून आली. राम कुठे दिसत नव्हते. तिच्या मनात
एक भयंकर शंका आली. प्रत्येक गोष्टीचा वेगळ्याच कुठल्या तरी उद्देशाने वापर
करणारे हे लोक! हे राम, सीता, लक्ष्मण वगैरे मूर्तींचा कपडे वाळत टाकण्यासाठी
नसतील ना उपयोग करत! अत्यंत धास्तावल्या मनाने ती घरभर फिरली सुदैवाने
तसलं दृश्य कुठे दिसलं नाही.
राम कुठे दिसेनात. परत कुणाकडे ठेवून आले की काय? वाईट घडलं, राम
घराबाहेर. चांगलं घडलं, राम आत.
तेवढ्यात सुधावैनींनी विचारलंच,
‘‘सुशीला, अग, राम कुठायत?’’
‘‘राम ना, गच्चीवर आहेत.’’
‘‘गच्चीवर?’’
‘‘हो. घराच जागाच नाही ना कुठे?’’
त्या गच्चीवर गेल्या. एका कोप-यात एक टेबल उलटे, आकाशाकडे पाय करून
पडलं होतं. त्याच्या आत बिचारे राम, सीता, लक्ष्मण उभे होते. पांढ-याशुभ्र संगमरवरी
मूर्ती उन्हाने काळ्या पडायल्या लागल्या होत्या. तरीही तशाच हसतमुख. नंदाच्या
मनात आलं, राम खरेखुरे असते तर एक बाण रंगावर नक्कीच सोडला असता.
दुस-या उताण्या टेबलात विठ्ठलराव आणि हनुमान अशी जोडी. हनुमान आता
विठ्ठलापुढे नम्र झालेला होता. ‘‘आणि रुक्मिणी कुठाय ? रखमाई’’
सुधाताईने विचारलं तेव्हा सुशीला म्हणाली, ‘‘रखमाई भंगली. लक्ष्मणाचा भाता
लागला तिच्या पाठीला.’’
हे भलतंच विनोदी. लक्ष्मण भाता तिरका करून रखमाईला मारायला का गेला?
त्याचा भाता आता तर वरच्या दिशेने. नंदा आणि सुधाताईंनी एकमेकींकडे पाहिलं.
सुशीलेच्या अबसर्ड सांगण्यानुसार चित्र डोळ्यासमोर आणण्याचा दोघी प्रयत्न करत
होत्या. पण लक्ष्मणाचा भाता रखमाईच्या पाठीला का आणि कसा लागला असावा
याचा काहीच अंदाज करता येईना.
सुधाताईंचं बालपण आणि तारुण्य ज्या गोष्टीच्या सहवासात गेलं होतं, ज्या
गोष्टी आपल्या जागेवर असल्यामुळे सगळं जग नीट चाललंय असं त्यांना वाटत होतं.

त्या गोष्टी अशा दयनीय होऊन उताण्या टेबलाखाली पडल्या होत्या. त्यांची छत्रं
चामरं, पालखी सगळं धूळ खात तिथेच पडलं होतं. चांदीची महिरप फक्त गायब होती.
तिच्याबद्दल विचारण्याची आवश्यकता नव्हती.
सुधाताईंचा आता घरावर काही अधिकार राहिला नव्हता. नंदा, सुमित्रा
वहिनींना तरी कोण विचारणार होतं.
दोघी निमूट खाली आल्या. रामाचा वनवास अजून संपला नव्हता. काही
दिवसांनतर एका नातेवाईकाच्या लग्नात त्या सगळ्यांची पुन्हा गाठभेट झाली. तिथं
रंगा आणि सुधाताईचं जोरात भांडण झालं. तशी लग्नं ही भांडणाचे अड्डेच असतात
म्हणा! अनेक दिवसांनी भेटलेल्या नातेवाईकांच्या उखाळ्या पाखाळ्या, रुसवे, फुगवे
आणि भांडणं.
सुधाताई प्रचंड संतापल्या होत्या. संतापाने त्यांना रडू फुटलं होतं, ‘‘तू आम्हाला
त्यांचे दर्शनही होऊ दिलं नाहीस. तुला काय अधिकार होता त्यांना असं पोत्यात घालून
टाकून द्यायचा, ती काय मांजरं होती?’’
हे कशाबद्दल चाललंय तिथं पोचलेल्या नंदाला कळेना. रंगभूमीवर नंदा
उपस्थित होताच सुधाताईंनी तिला सांगायला सुरुवात केली. ‘‘अगं, हा म्हणतो,
वादळात सगळ्या मूर्तीचे तुकडे तुकडे झाले. पोत्यात घालून विसर्जन करून आला
म्हणे!’’ रंगाच्या म्हणण्यानुसार भलंमोठं वादळं झालं होतं, जे त्याच शहरात राहणा-या
असूनही सुधाताई आणि नंदाला ठाऊक नव्हतं. त्या वादळात जडशीळ मूर्ती एकमेकींवर
उडून पडल्या आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले; एवढेच नाही तर त्याची छत्र चामरं वगैरे
तर उडून मागच्या बोळात पडले होते म्हणे.
मग त्या गोजिरवाण्या मूर्तीचे तुकडे आणि अनेकांचे बालपण, तारुण्य,
अनेकांच्या श्रद्धा पोत्यात भरून रंगा नदीत सोडून आला होता. रामाच्या नशिबी
इतका भयानक शेवट रामायणातही आला नव्हता. माणसाच्या अंधश्रद्धा आणि
अर्थकारणाचे बळी देव ठरले होते.

By

Sujata Mahajan,

USA

Wednesday, 20 February 2019

अरे संसार संसार

बाईच बाईचा शत्रू असते असं नसून समोरच्या बाईच्या बोलण्या,वागण्याकडे आपण कशा दृष्टीकोनातून बघतो यावर शत्रुत्व की मित्रत्व की शुभचिंतक हे ठरवलं पाहीजे.  असं पल्लवी,  माझी वयाने छोटी पण प्रगल्भ विचारांची मैत्रीण मला गप्पांच्या ओघात म्हणाली.

खरं सांगू, मी तिच्या वयाची असताना खरंच इतकी समजूतदार नव्हते.  बाईच बाईला छळते, शत्रू असते, घर मोडते इत्यादी मतं माझीही होती.  याला कारण तेव्हाची आजूबाजूची परिस्थिती, काॅलेज संपायच्या आधीच लग्न झालेलं अशी अनेक कारणं असू शकतील नव्हे होतीच.

सासरी आम्ही रहात असलेल्या इमारतीत अक्षरशः सर्व धर्माची बि-हाडं होती.  आगरी,  सिंधी, ख्रिश्चन, मराठा, सोनार, मुस्लीम, सीकेपी, ब्राह्मण.  बरं यात सासूबाईंच्या वयाच्या तिघीजणी होत्या.  माझ्यासारख्या नव्या सासूरवाशिणी चार जणी होत्या.  आणि चार पाच जणी दोन मुलं/ एक मुलं आणि राजा-राणी अशा टाईपच्या होत्या.

तिन्ही अहो आई (आगरी, मराठा आणि ब्राह्मण) यांच्या गप्पा ओघानेच सुना, घरकाम या विषयाकडे वळायच्या आणि कळत नकळत त्याचे पडसाद आमच्या घरातही उमटायचे.  त्या तुलना, टोमणे नको व्हायचे.  मी माझी नोकरी बरी आणि घरी आलं की घरातली कामं, वाचन टी.व्ही बघणं बरं या स्वभावाची होते तरीही हमखास कोणीतरी बिल्डींगमधलंच (बाईच बरंका) आईंबद्दल काहीतरी सांगेच.  कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी मनात ते ठसठसत राहीच. यात भर म्हणून की काय आईंनी मला स्पष्ट सांगून टाकलं होतं "की मी काही मुलीची जबाबदारी अजिबात घेणार नाही".  मला वाटे मावशींची मुलं बरी सांभाळता आली ह्यांना. बहिणीची, भावजयांची वाळवणं, पापड, फेण्या, हळदी, तिखटं बरं धावून धावून करता येतात. फक्त माझ्यासाठी काही करता येत नाही.

आईला ही अशी कुरकुर केली की आई मलाच समजावे. "सुरेख, असं नसतं गं!  लहान मुलाची जबाबदारी खूप असते. इतर कामं परवडतात.  पण मुलांचे हट्ट, खाणं पिणं करण्यात दमछाक होते. आडनिड्या वयाच्या मुलांना ना उचलून घेता येत ना ओरडता येत.  त्यातून काही वयानंतर मनाची तयारी असते. पण शरीर साथ देत नसतं".

आईचाही मला जाम राग येई.  वाटे माझी आई माझं दुःख समजून घेतच नाहीये.  वाद व्हायचे आमचे. आई मुलीला सांभाळायची त्याबद्दल टोकलं तर म्हणायची,"माझी अजून पंचेचाळीशी पण आली नाहीये.  झेपतंय तोवर सांभाळणार नातीला. होत नाहीसं झालं की तेही सांगणारच तुला.  आत्ता तुला माझ्या मदतीची गरज आहे.  पैसा पैसा जोडणं तुला करणं आवश्यक आहे.  म्हणून मी मुलीला सांभाळतेय".

आता माझी पन्नाशी उलटल्यावर माझ्याच आयुष्यातल्या घटनांकडे मी त्रयस्थपणे बघते तेव्हा जाणवतं की केवळ आईच्या दबावामुळे, समजावण्यामुळे, संस्कारांमुळे आणि माझ्या तडजोड करण्याच्या वृत्तीमुळे आमच्यात टिपिकल सासूसुन संघर्ष झाला नाही. जगाला बघायला मिळाला नाही. पण मी आईंवर प्रेम, मायाही नाही केली. ब-याच गोष्टी कशा करू नयेत, कसं वागू नये हेच शिकले असं कडवटपणे मी आत्तापर्यंत सांगायची. पण आता मात्र मी तेव्हाच्या त्यांच्या स्थितीचा विचार करू शकते आणि त्यांच्याबद्दलचा मनातला सल बोथट होतोय हे जाणवू शकते. 

आईने मला घटनेकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन दाखवला नसता तर कदाचित सासूच्या छळाच्या कहाण्या माझ्याकडेही असत्या.  

आता मी सुनेची सासू होण्याच्या वयात आले आहे. पण हल्लीची मुलं खूप प्रॅक्टीकल आहेत. फारसा त्रास करून घेणारी नाहीयेत. भावनिक त्रास, गुंतवणूक करणारीही नसावित. तरीही मी सासू म्हणून, आई म्हणून, बाई म्हणून घरात येणा-या मुलीला, तिच्या वागण्याला कोणतीही लेबल्स न लावता स्वीकारायची तयारी ठेवली तरी आहे.  माहित नाही भविष्याच्या पडद्यामागे काय लपलंय. पण एक मात्र खात्री आहे नवरा  तेव्हा मला म्हणायचा "तू लहान आहेस ना! लहानांनी मोठ्यांचं ऐकायचं असतं." आणि आता म्हणेल, "अगं तू मोठी आहेस ना? तू नाही सांभाळून घ्यायचं लहान मुलीला तर कोणी घ्यायचं?"

By

Anagha Joshi

Talegaon, India

सत्याच्या प्रकाशात चालायचं असतं ते, एकट्यानेच!

 ‘तुंगा’ च्या बाबतीत सर्व शिक्षकांचं एकच मत होतं, ‘तिच्या चेह-यावरची माशी हलत नाही.’ पण वर्गात पहिल्या पाचात येणा-यात ‘तुंगा’ होती. बाकी कश्शा – कश्शात ती भाग घेत नसे. ना क्रीडा, ना संगीत, ना वक्तृत्व, ना नाटक. काहीही नाही. नाही म्हणायला तिच्या एका चलाख मैत्रिणीने ‘मी तुंगाला घेऊन नाटक करून दाखवीन’ असं आव्हान स्वीकारून तुंगाला नाटकात घेतलं. नुसतं नाटक नाही, ‘विनोदी’ नाटक. स्त्रीराज्यात सापडलेल्या एका मॅनेजरची त्रेधातिरपीट वर्णन करणारं नाटक. तुंगा त्यात पुन्हा पुन्हा बाळंतपणाच्या रजेवर जाणारी कारकून होती. प्रॅक्टिसच्या वेळी तुंगाचे संवाद अचूक पाठ असत. दिग्दर्शक मैत्रिणीचा तिच्यावर दृढ विश्वास होता. ‘तुंगा’ने तो सार्थ ठरवला. मैत्रिणीने तिला संवाद अगदी मोजकेच ठेवले होते. पण तुंगाने ते इतक्या ठसक्यात म्हटले की तिला हिणवणारे शिक्षकसुद्धा पाहत राहिले. 

    तुंगाला चांगले मार्क्स मिळाले. मायक्रोबायोलॉजी सारखा विषय घेऊन ती बी.एस.सी. झाली. पुढे खूप काही करू शकणारी तुंगा अचानक दूरध्वनी केंद्रात कामावर रुजू झाली. तेव्हा अनेक जण हळहळले. ‘तुंगा’ने शिक्षण पुढे न वाढवण्याचा आणि नोकरी करण्याचा निर्णय घरच्या गरिबीमुळे घेतला होता. त्याबद्दल तिच्या तोंडून तक्रारीचा, पश्चातापाचा सूर कधीच कुणी ऐकला नाही.

    तिने आनंदाने नोकरी स्वीकारली. पुढे लोकांना तिने आणखी एक धक्का दिला तो म्हणजे तिच्याच ऑफिसात काम करणा-या सहका-याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन.

    सुरेश तिचा नवरा – चारचौघांसारखा, चारचौघांच्या रीतभातीत बसेल ते ते करणारा होता. दोघंही एके ठिकाणी नोकरी करतात म्हणून सुरुवातीला ऑफिसातल्या सहका-यांच्या प्रेमळ चेष्टेचा विषय बनले. पुढे पुढे लोकांना सवय झाली.

    सुरेशच्या घरी कडक स्वभावाची आई आणि वडील होते. सुरुवातीला काही दिवस सासूचा जाच तुंगाने निमूट सहन केला. नंतर ती सासूला शब्दात पकडू लागली. तिच्या बोलण्यात लॉजिक नसल्याचं दाखवून देऊ लागली. टिप-या अधूनमधून चालत. पण कधी विकोपाला गेलं नाही. कारण तुंगा इतक्या हसतमुखाने मजेदारपणे सासूच्या चुका दाखवून द्यायची. संतापणं नाही, धुसफूस नाही. शांतपणे आपल्याला हवं ते करत रहायची.

    काही वर्षांनी नोकरीत प्रमोशन मिळावं म्हणून वरच्या ग्रेडच्या परीक्षा देण्याची कल्पना पुढे आली. तुंगाने ती त्वरित उचलून धरली. सुरेशला काही ती कल्पना आवडेना पण त्याचा मित्र ‘अमित’ आणि तुंगाने त्याला भरीस घातले.

    तिघंही परीक्षेला बसले. अभ्यासाला लागले. सुरेशला ऑफिसातनं आल्यावर वेळ असायचा पण तो थोडावेळ झोपायचा मग टीव्ही पहायचा, मग जेवून झोपायचा.

    तुंगाला आल्या आल्या घराच्या, मुलांच्या सेवेत उभं रहावं लागायचं. सगळं आवरून झोपायला तिला खूप उशीर व्हायचा. बेडरुममध्ये आल्यावर ती सुरेशकडे पहायची. तो झोपला असेल तर शांत चित्ताने अभ्यासाकडे वळायची. जागा असेल तर पुस्तक खाली ठेवून गुपचूप त्याच्या शेजारी झोपायला जावं लागायचं.

    चहा – स्वयंपाक करताना, कपड्यांच्या घड्या करताना, डाळ-तांदूळ निवडताना, फर्निचरवरची धूळ साफ करताना, आंघोळ करून बाहेर आलेल्या छोट्याचं डोकं पुसताना, थोरल्या सोनूची वेणी घालताना तिच्या डोक्यात फक्त अभ्यासाचेच विचार असायचे. वाचलेल्या संकल्पना आठवायच्या, नवे प्रश्न पडायचे. उत्तर देणारं कुणीच नव्हतं. किंबहुना ठरलेल्या मजकुराबाहेर स्वतंत्र चिंतन असावे अशी अपेक्षाही नव्हती.

    अभ्यासासाठी घरातलं एखादं काम बाजूला ठेवलेलं चालत नव्हतं. सगळं दोरीत जिथल्या तिथे करावं लागायचं. पण तुंगाची तक्रार नव्हती. कशाबद्दलच. वेळ मिळत नाही. घरातले लोक मदत करत नाहीत, मुलं सारखं गुंतवून ठेवतात, या कशाबद्दलच नाही. सुरेशने अभ्यास करावा असं मात्र तिला वाटायचं. ती म्हणायची सुद्धा त्याला तसं. पण सुरेश लक्ष द्यायचा नाही. बघता बघता परीक्षा जवळ आली. याच काळात मुलांच्या परीक्षा होत्या. त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्या खाण्याच्या वेळा सांभाळणं ही जबाबदारी होतीच. पहिल्या पेपरच्या दिवशी तिने, सुरेशने पहाटे उठून अभ्यास केला. पेपर समोर आल्यावर तिला एकदम हसू आलं. काय हे! बीएस.सी. नंतर जवळ जवळ १२ वर्षांनी ही वेळ. सुरुवातीला वाक्यरचना कशी करावी हेच सुधरेना. पेपर समोर ठेवून ती मूढपणे त्याच्याकडे बघत राहिली. ब-याच काळानंतरच एक सामान्य वाक्य तिच्या मनात तयार झालं. हे लिहिलं आणि झालं! लिहीतच राहिली. सुपरवायझर हातातून पेपर घ्यायला आले तेव्हा तिने लिहिणं थांबवलं.

    मान, पाठ, खांदे सगळं ठणकत असताना डाव्या हाताने उजवा खांदा दाबत ती बाहेर आली. सुरेशला पाहून आनंदाने धावत त्याच्याकडे गेली अन्‌ विचारलं, ‘‘कसा गेला?’’

    कपाळाला आठ्या घालून सुरेश म्हणाला, ‘‘कसा जाणार? अवघड!’’

    ती म्हणाली, ‘‘मला सोपा गेला.’’ सुरेशने चमकून तिच्याकडे पाहिलं, ‘‘तू सगळे प्रश्न लिहिलेस?’’

    ‘‘हो. एकूण एक.’’

    तेवढ्यात अमित आला, ‘‘सोपा होता यार’ म्हणत.

    तिघंही एका कट्ट्यावर बसले. तिथेच पेपर सोडवायला सुरुवात. ‘तुंगा’ची उत्तरं ऐकून अमित थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिला. सुरेशने अस्वस्थ होऊन विचारलं, ‘‘काय रे अमित, काय म्हणतोस? किती मार्कस्‌ पडतील हिला?’’

    ‘‘ऐंशीच्या पुढे सहज’’

    हे उत्तर ऐकताच सुरेशचा चेहरा चपराक बसावी तसा झाला.

    ‘‘खरं म्हणतोस?’’

    ‘‘हो मग, बघच तू.’’

    सुरेश पुढे काहीच बोलला नाही. दोघेही आपापल्या गाड्यांपाशी गेले. तुंगा सुरेशचा चेहरा निरखून पाहत होती. त्याला काय बोचतंय याचा अंदाज तिला आला होता. त्यामुळे तिनेही स्वतःचा आनंद आवरता घेतला.

    परीक्षेसाठी दोघांनीही रजा घेतली होती. त्यामुळे घरीच आले. आईने उत्सुकतेने विचारलं, ‘‘कसा गेला?’’ एकाचवेळी ‘‘चांगला’’ आणि ‘‘वाईट’’ अशी उत्तरं आली. आईचाही चेहरा पडला. ती सुरेशला म्हणाली, ‘‘हिला सोपा न्‌ तुला अवघड गेला होय? आता हिला जास्त मार्क न्‌ तू नापास झालास तर?’’

    आईचं हे डायरेक्ट बोलणं सुरेशला मानवलं नाही. तो खेकसून म्हणाला, ‘‘कायतरी बोलू नकोस गं!’’ आईने भांडी लावण्याच्या निमित्ताने आदळआपट सुरू केली. तोंडाने काहीतरी रागारागात पुटपुटणं चालूच होतं. सुरेश वर निघून गेला. थोड्यावेळाने तुंगा बेडरूममध्ये आली.

    ‘‘काय झालं? बरं वाटत नाही का? आज लवकर उठलोय पहाटे. झोप झाली नाही. थोडं झोपूयात.’’ सुरेशचा चेहरा अतिशय चिंतामग्न दिसत होता. तुंगा त्याच्याशेजारी झोपली. त्याच्या छातीवर डोकं टेकवलं.

    ‘‘कसला विचार करता एवढा? काही टेन्शन आहे का?’’

    ‘‘तुंगा...’’ सुरेश इतक्या घोग-या आवाजात बोलला, की त्याला स्वतःलाच दचकल्यासारखं झालं. तुंगा तर उठूनच बसली तो आवाज ऐकल्यावर.

    ‘‘तुंगा...’’ सुरेश तिच्याकडे न पाहता समोरच्या भिंतीकडे पाहत बोलायला लागला. ‘‘तुंगा, मी जे बोलतोय ते नीट ऐक. असं समजू नकोस, की तुझी प्रगती पाहून मला वाईट वाटतंय. पण आपण ज्या समाजात रहातो तो एवढा पुढारलेला नाही. इथं पुरुषापेक्षा एखादी बाई श्रेष्ठ ठरते ही कल्पना लोकांच्या पचनी पडत नाही. अशा मागे पडलेल्या पुरुषाकडे लोक फार विचित्र नजरेने पहातात, जणू तो नपुंसकच असावा.’’

    तुंगाला हळूहळू अंदाज यायला लागला होता सुरेशला काय बोचतंय याचा. पण त्याच्या पुढच्या वाक्याने तिच्यावर बॉम्बच पडला.

    ‘‘माझी तुला कळकळीची विनंती आहे, तू उद्याच्या परीक्षेला बसू नकोस.’’

    ‘‘काय?’’

    ‘‘हो तुंगा, तू एवढ्या मार्कांनी पास झालीस आणि मी नापास झालो तर... तू विचार कर. आपल्या मुलांना काय वाटेल? आईला एवढे मार्क आणि बाबा नापास? तू विचार कर माझ्या आई-बाबांना काय वाटेल?’’

    तुंगा थिजल्यासारखी ऐकत होती. आपोआपच तिची मान नकारार्थी हलायला लागली. ते पाहून एक्साईट झालेला सुरेश जोरजोरात बोलायला लागला, ‘‘तू पास झालीस तर तुला प्रमोशन मिळेल आणि ट्रेनिंगसाठी वर्षभर पाठवतील. आपल्याला कसं जमणार ते? एक वर्षभर तू बाहेर रहाणं? मुलांचं कोण करणार? आईबाबांचं कोण करणार? ते काही खरं नाही. मला याच मुद्यासाठी तू परीक्षेला बसायला नको होतीस. मी काही इतका क्षूद्र नाही की तुझ्या यशाने नाराज होईन. पण आपण संसार मांडलाय तर आपणच तो सांभाळायला हवा, नाही का? तो विखुरला तर काय उपयोग? माझं एवढंच म्हणणंय की आत्ता तू बसू नकोस. वाटलं तर... वाटलं तर पाच-सहा वर्षांनी दे परीक्षा. काय मोठासा फरक पडतो. मुलं पण मोठी होतील तोवर.’’

    तुंगा अवाक्‌ होऊन त्याच्या रणनीतीला मनोमन दाद देत होती. तिचं नकार देणं आता थांबलं होतं. सुरेशने अजिजीने तिच्या गळ्यात हात टाकून म्हटलं, ‘‘ऐकशील ना एवढं माझं?’’ तुंगा काहीच बोलली नाही. तिने उशीवर मान टेकवली तेव्हा खळकन्‌ एक अश्रूंनी धार तिच्या गालावर ओघळली. सुरेश ते पाहून तडकून म्हणाला, ‘‘हे बघ, मी काय अन्याय बिन्याय करतोय तुझ्यावर, असं समजायचं कारण नाही. मी हे सगळ्यांच्या भल्याचंच सांगतोय. याउप्पर तुझी मर्जी.’’ तो उठून खाली निघून गेला. त्याच्या चेह-यावरचा ताण आता कमी झाला होता. 

    चार भिंतींच्या चौकोनी पेटीत पलंगावर पडलेलं तुंगाचं शरीर आणि मन निर्णयक्षम राहिलं नव्हतं. डोळ्यातल्या धारा थांबत नव्हत्या. बीएस.सी. ला असताना तिच्यावर प्राध्यापकांच्या आशा केंद्रित होत्या. ती एमएस.सी. करणारच हे प्रत्येकाला ठाऊक होतं. बीएस.सी.चा रिझल्ट घेऊन ती घरी आली. धो धो मार्क्स होते. बाबा थकलेल्या, मिणमिणत्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाले, ‘‘तुंगाक्का, आता नोकरी शोधायला लागा. माझ्या एकट्याच्या पगारावर किती काळ रेटायचं हे सारं. मकरंदचं पण शिक्षण व्हायचंय. त्याला इंजिनियर करायचंय.’’

    मकरंद इंजिनियर होणार नव्हता. सिग्रेटी फुंकत गावभर पोरींच्या मागे फिरण्यात त्याचे दिवस चालले होते. पण आईबाबांच्या त्याच्यावर केंद्रित झालेल्या आशा शाबूत होत्या. ..... अशी कुठली वेळ असेल जेव्हा आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्याला घेता येईल? कदाचित आपलं लग्न झाल्यावर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळेल’ असं वाटून तुंगाने लगेच नोकरी मिळवली, लग्नही केलं. आणि आता शिक्षणात कर्तृत्व दाखवण्याचं तिचं स्वप्न पुन्हा एकदा संपलं...

    ती खाली आली. घरात सगळेजण तणावरहित अवस्थेत वावरत होते. तिने चहाचं भांडं घेतलं. गॅसवर आधण ठेवलं. दुस-या शेगडीवर दुधाचं पातेलं ठेवलं. ओट्याला टेकून ती आपल्याच घराकडे स्वतःतून बाहेर पडल्यासारखी पहात राहिली.

    रात्री ती बेडरूममध्ये आली तेव्हा तिच्या मनात काहीही खळबळ शिल्लक नव्हती. चेहरा नेहमीसारखाच शांत होता. प्रति रणनीती तिच्या डोक्यात तयार होती. 

    सुरेश तिच्याकडे पाहून हसला. त्याच्या दृष्टीने आता कोणतंच टेन्शन राहिलं नव्हतं. तुंगा त्याच्याजवळ बसली आणि अतिशय निर्धाराने बोलली. ‘‘मी परीक्षेला बसणार आहे. आपल्या सर्व कुटुंबाला वर नेणारी ही संधी आहे. ती केवळ ‘इगो’ पायी गमावणं मूर्खपणाचं आहे. वर्षभर मला बाहेर जावं लागेल. तेवढा काळ आई-भाऊ मुलांना सांभाळतील. त्यांच्या मदतीला आपण एखादी बाई ठेवू कामाला. तुम्ही स्वतः घरात थोडं लक्ष घाला. मुलंही आता खूप लहान नाहीत. स्वतःचं करू शकतात. माझं प्रमोशन झालं तर दर आठ दहा दिवसांनी मी येईनच. पण आपला परिस्थिती किती सुधारेल याचा विचार करा. मुलांच्या शिक्षणासाठी या अवघड काळात किती पैसे लागतात विचार करा. माझ्या मनात तुमच्याविषयी रिस्पेक्ट वाढेल. दोघांपैकी ज्याला जे जमेल ते त्याने करावं. सबंध घराच्या प्रगतीसाठी मी कष्ट करीन. तुम्ही त्याग करा. काय हरकत आहे?

    सुरेश काही बोलला नाही. पण ‘तुंगा’ चा प्रॅक्टिकल अप्रोच टाकून देण्यासारखा नक्कीच नव्हता. काय हरकत आहे?

    दुस-या दिवशी ती काही न बोलता तयार झाली. सुरेशबरोबर पेपरला गेली. पेपर लिहिताना पहिला आनंद, महत्त्वाकांक्षेची एक्साईटमेंट काहीही राहिलं नव्हतं. वारंवार डोळे भरुन येत होते. निर्जीवपणे ती लिहीत राहिली.

    अखेरीस रिझल्ट लागला. व्हायचे तेच झाले. ती डिस्टिंक्शनचे गुण मिळवून उत्तीर्ण झाली आणि सुरेश नापास झाला !

    रिझल्ट हातात पडल्यावर सुरेशच्या चेह-यावर संताप स्पष्ट दिसला. ‘‘सांगितलं होतं तुला मी. किती नाचक्की होईल आता माझी’’ आपल्या नापास होण्याचा संबंध आपल्या अकार्यक्षमतेशी नसून तुंगाच्या गुणवत्तेशी आहे असंच त्याला वाटत राहिलं.

    ‘तुंगा’ला आनंद झालाच होता. आपल्या उत्तम गुणांचा योग्य तो अभिमान तिला वाटत होता. माझ्यात अजूनही ‘ते’ आहे जे मी विसरून गेले होते, असं तिला वाटत होतं.

    दारात सासूसासरे वाट पहात होते. त्यांनी दारातच सुरेशला हटकलं. तो चिडून म्हणाला, ‘‘आत तर चला ना?’’

    आत गेल्यावर रिझल्ट फेकून देत म्हणाला, ‘‘नापास झालो! कळलं का, नापास झालो!’’

    ‘‘अगंबाई!’’ सासूबाई मटकन्‌ सोफ्यावर बसल्या. अन्‌ सुरू झाली रडारड. सगळे रडायला लागले.

    तुंगाला वाटत होतं, आपल्या मार्कांमुळे सुरेशच्या अपयशाचं दुःख लोक विसरतील पण त्यांनी कुणीही तिला विचारलं सुद्धा नाही. कुणीतरी ‘गेल्यासारखी’ रडारड चालू राहिली. तुंगा थक्क होऊन त्या तमाशाकडे पाहत राहिली.

    माहेरच्या अणि सासरच्या घरात आपले असे काय होते? आपल्या सुखदुःखाचे भागीदार कोण होते? स्वयंपाकघराच्या पडद्यापाशी उभं राहून ती रडणारी त्रिमूर्ती पाहताना तिला लख्ख जाणवलं, हा प्रवास एकट्याचाच असतो.

    काही काळ काही भ्रम असतात आपल्याबरोबर. ते भ्रमच असतात, सावल्या असतात.

    जेव्हा ज्ञानाची जाणीव फुटते तेव्हा आपल्याला सोडून जातात ते. जावंच त्यांनी. 

By

Sujata Mahajan

Chicago, USA